Friday, April 4, 2008

भूकंपामुळे घाबरू नका, काळजी घ्या !

भूकंपापूर्वी काळजी घ्या!
भूकंप कधी होईल हे सांगता येत नाही. त्याच्या वेळेबाबत निश्‍चित अनुमान काढण्याइतपत शास्त्राची प्रगती झालेली नाही. त्यामुळे भूकंपाला घाबरून जाऊ नका, परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी आपापली काळजी घेणे आवश्‍यक आहे, असे आवाहन महात्मा गांधी मिशनच्या खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले.

नातेवाईकांचे पत्ते, दूरध्वनी जवळ ठेवा
नागरिकांनी घरात दोन, तीन दिवस पुरेल एवढे टिकाऊ खाद्यपदार्थ, बॅटरी, अतिरिक्त सेल, प्रथमोपचाराचे साहित्य, औषधी, पाणी, काही रोख रक्कम या वस्तू कुटुंबातील सर्वांना माहिती असतील अशा जागी ठेवाव्यात. घरातील उंच ठिकाणी वजनदार व काचेच्या वस्तू ठेवू नयेत. आपत्कालीन परिस्थितीत संपर्काचे व शाळेत जाणाऱ्या मुलांच्या भेटीच्या विशिष्ट जागेचे नियोजन करून ठेवावे. जवळच्या मित्र व नातेवाईकांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक याची माहिती कुटुंबातील प्रत्येकाकडे लेखी स्वरूपात द्यावी.

स्वत-वरील उपचारानंतर इतरांना मदत करा
भूकंपानंतर स्वत- जखमी झाला असाल तर आधी आपल्यावर उपचार करा. त्यानंतर इतरांना मदत करावी व जखमींना प्रथमोपचार द्यावेत. प्रसारमाध्यमांद्वारे आलेल्या सूचनांची व उपाययोजनांची माहिती करून घ्यावी, मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्यास आगपेटीची काडी ओढू नये त्याऐवजी शिट्टी वाजवावी अथवा कोणताच पर्याय नसल्यास ओरडावे. नाकावर व तोंडावर रुमाल ठेवावा. प्रशासनाकडून सूचना मिळण्यापूर्वी पडलेल्या इमारतीकडे जाऊ नये.

विजेच्या तारांपासून सावध रहा -
भूकंपाचा कालावधी हा अत्यल्प असतो, त्यामुळे चार-पाच पावले टाकावी लागणार असतील तरच घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा टेबल, पलंग, पक्का दरवाजा याखाली अथवा सिमेंटच्या कॉलमजवळ जिथे वजनदार वस्तू पडणार नाहीत, अशा ठिकाणी डोक्‍यावर हात ठेवून बसावे. काचेच्या खिडक्‍यांपासून दूर राहावे. भूकंपानंतर आणखी धक्के बसण्याची शक्‍यता असल्याने पडलेल्या इमारती व विद्युत तारांपासून सावध राहावे. लिफ्टचा वापर करू नये, त्याऐवजी जिन्याचा वापर करावा. गडबडीत पळत बाहेर येऊ नये. वाहनात असाल तर वाहन थांबवून वाहनातच बसून राहावे. घराचे बांधकाम करताना वास्तुशास्त्रज्ञांकडून घराचा आराखडा तयार करून आणि महापालिकेची परवानगी घेतल्याशिवाय घराचे बांधकाम करू नये. काही घरे, इमारती पडण्याचा धोका असेल तर त्याची माहिती प्रशासनास कळवावी.

भूकंपरोधक घराची बांधणी हवी
भविष्यातील भूकंपापासूनचा धोका टाळण्यासाठी भूकंपविरोधक घरे बांधण्यासाठी नागरिकांचे व बांधकाम कारागिरांचे प्रबोधन करणे काळाची गरज आहे. घराची दुरुस्ती, मजबुतीकरण व पुनर्बांधणीसाठी जनतेला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. किल्लारीच्या भूकंपानंतर भूकंपप्रवण घरांना भूकंपरोधक करण्यासाठी त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण व पुनर्बांधणी तांत्रिकदृष्ट्या शक्‍य करून अनुदान देण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या अनुदानातून अनेकांनी आपली घरे भूकंपरोधक करून घेतली आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा राज्यातील भूकंपप्रवण जिल्ह्यातील घराचे सर्वेक्षण करून त्याला भूकंपरोधक करण्यासाठी घर दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी शासनाने अनुदान योजना जाहीर करावी व त्याच्या अंमलबजावणीसाठी शासकीय स्तरावर समिती स्थापन करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक
अग्निशमन केंद्र - १०१, २५२५५५
नियंत्रण कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय) - २३५०७७
नियंत्रण कक्ष (पोलिस अधीक्षक कार्यालय) - १००, २३४७२०
नियंत्रण कक्ष (महापालिका कार्यालय) - २३४४६१
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय - १०२, २३५७११.

0 comments:

Post a Comment

Post a Comment