Monday, April 19, 2010

यांचा काही नेम नाही.



नांदेड भारनियमनमुक्त होईल हे स्वप्न पाहायचे सोडून द्या. (मी सोडून दिले आहे.)

१ एप्रील पासून नांदेड भारनियमनमुक्त होईल असे जाहीर करण्यात आले होते.
लोडशेडींगपासून तर काही मुक्तता झाली नाही नांदेडची, हां पण १ तासाने लोडशेडींग वाढली जरूर आहे.

चला प्रकाशाकडून अंधाराकडे.....

नवे महापौर.



श्री. अजय बिसेन यांची नांदेड-वाघाळा मनपाच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. :-)



Wednesday, April 14, 2010

माहूरच्या जंगलात ३ बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू.

आज सकाळी वृत्तपत्रामध्ये ही बातमी वाचून अक्षरशः सुन्न झालो.
आधीच आपल्या मराठवाड्यात जंगलं राहीली नाहीत, काही ठिकाणी आहेत तर तीथेही मनुष्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
आपल्या नांदेडमध्ये तर माहूर आणि किनवट या दोन तालुक्यांमध्येच थोडंफार जंगल शिल्लक राहीलं आहे.
त्यात अशी बातमी म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच. :(

पण या ३ बिबट्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याबद्दल कुणीही खात्रीपुर्वक सांगू शकत नाहीये.
वृत्तपत्रांच्या मते या बिबट्यांवर विषप्रयोग झाला असावा.
या बिबट्यांनी २ दिवसांपूर्वी एका शेतातील म्हैस मारली होती आणि तीला खायला हे बिबटे दुसर्‍या दिवशी आले आणि उर्वरीत म्हशीचे मांस खाऊन तीथेच मरून पडले.
याचाच अर्थ की बिबट्यांच्या परत येण्यापूर्वी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या मृत म्हशीच्या मांसात विष कालवले असणार, आणि त्यामुळे बिबट्यांचा मृत्यू ओढावला असणार.

पण वृत्तवाहिन्यांच्या मते आसपासच्या परीसरात या ३ बिबट्यांव्यतीरीक्त कुठेही मृत जनावराचे मांस सापडले नाही.
यावरून काही जण असा निष्कर्ष काढताहेत की या बिबट्यांचा मृत्यू ऊष्माघातामुळे झाला असावा.

आत्ताच एका वृत्तवाहिनीवर वनविभागाच्या अधिकार्‍यांच्या संशयास्पद कार्यवाहीबद्दल सांगत होते.
वनविभागाच्या अधिकार्‍यांनी म्हणे मृत बिबट्यांचे शवविच्छेदन न करता त्यांची तीथेच विल्हेवाट लावली.
वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी या बातमीचा सातत्याने पाठपुरावा केला तरच दोषी लोकांना शिक्षा होऊ शकते

एकंदरीत हा सगळा प्रकार फारच दुर्दैवी म्हणावा लागेल. :(


ता. क. :- (5 May 2010)
1) हा प्रकार झाल्यानंतर काही दिवसांतच या जंगलात परत एका अस्वलाची शिकार झाली.

2) काल लोहा तालुक्यातल्या आंडगा या गावात एका विहीरीत ४ नर काळविटांचे मृतदेह सापडले.
शेतातील कुंपनात सोडलेल्या विजेच्या शॉकमुळे त्यांचा मृत्यु झाला असावा आणि नंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांना विहीरीत टाकून देण्यात आले असावे असा संशय व्यक्त केल्या जातोय.

Thursday, April 8, 2010

सूर्यनारायन कोपतोय.

सूर्यनारायन कोपला.
आठवतोय का हा ब्लॉगपोस्ट ? (इथे क्लिक करा.)
मागच्या वर्षी २० एप्रीलला लिहीला होता मी तो ब्लॉगपोस्ट. (तेव्हा नांदेडचे तापमान ४२ अंश सेल्सीअसवर पोहोचले होते.)

यावर्षीही परीस्थीती काही वेगळी नाहीये.
यावर्षीच्या एप्रीलच्या पहिल्या आठवड्यातच तापमान ४२ ते ४३ च्या दरम्यान जाऊन पोहोचले आहे.
अजून मे यायचा बाकी आहे.


मार्चमध्ये ४-५ वेळा पाऊस पडून गेला, तोही अगदी मुसळधार.
नंतर १-२ दिवस वातावरण थंड झाले होते, पण एप्रीलपासून उन्हाने परत आपला पारा चढवलाय. (त्यात वीज वितरण कंपनीने एप्रील फूल केलेच आहे आपल्याला. [हा पोस्ट वाचा.])


मागच्या वेळी मी खरंतर म्हणालो होतो की ग्लोबल वार्मिंगची समस्या अजूनही हाताबाहेर गेलेली नाही, पण या १ वर्षात अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्यांच्यामुळे मला माझ्याच विधानावर विश्वास ठेवावा वाटत नाहीये. (अनेक देशांमध्ये रेकॉर्डब्रेक बर्फवृष्टी, जंगलातील भयंकर मोठे वणवे, आपल्याकडे तर मागचा पावसाळा कोरडा आणि हिवाळा विनाथंडीचा झाला इ.)


चला, किमान प्रार्थना करूया की नांदेडच्या उन्हाळ्याने यावर्षी कोणताही रेकॉर्ड ब्रेक करू नये.


ता.क. :- (१५ एप्रील २०१० ३.३० PM)
आपल्या ब्लॉगवरील विजेट आणि Weather Underground वर नांदेडचे आजचे तापमान ४४° दाखवत आहे.


ता. क. :- (१६ एप्रील २०१० ८:२८ PM)
ग्लोबल वार्मिंगवर लिहून लिहून थकलोय मी.
अर्ध्या तासापूर्वी सोसाट्याचा वारा सुटला होता शहरात. (शहरात काही पाऊस पडला नाही, पण नांदेडच्या आसपासच्या परीसरात खूप जोरदार पाऊस पडला म्हणे.)


ता. क. :- (२९ एप्रील २०१० ६:३६ PM)
छान पाऊस पडतोय बाहेर.
मातीचा सुगंध दरवळतोय.


ता.क. :- ४ मे २०१० (८.५५ AM)
तीन दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.
सध्या तापमान ४३ अंशावरून ३३-३४ अंशावर आले आहे.


ता. क. :- ११ मे २०१० (८.३७ AM)
रेकॉर्डब्रेक !
काल नांदेडचे तापमान ४४.१ अंश सेल्सीअस होते. (कालचे महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त.)


ता. क. :- १६ मे २०१०
२ दिवसांपूर्वी नांदेडचे तापमान ४४.३ होते.
गेल्या ३-४ दिवसांपासून भयंकर उकडतंय.
तापमान अजून २ अंशाने जरी वाढले तरी तंदूरी चिकन बनवण्यासाठी भट्टीची गरज भासणार नाही.
दुपारी भयंकर उन आणि रात्री प्रचंड उकाडा !
काही खरं नाही बुवा.


ता. क. :- (३ जून २०१० ७:४० AM)
सुटलोत (बहुतेक ?) एकदाचे या गर्मीपासून.
काल सकाळी पाऊस पडला आणि दिवसभर ढगाळ वातावरण होते.
काही दिवसांपूर्वीच सकाळी ७ वाजतादेखील चांगलेच तापायचे, पण आज सकाळचे ८ वाजत आलेत तरीही उन पडले नाही आणि वातावरणसुद्धा थंड आहे.

नांदेडहून आता दिल्ली, नागपूरलाही विमानसेवा

नांदेड - नांदेडहून विमान सेवेचा विस्तार होत असून मंगळवारी (ता. सहा) दिल्ली- नांदेड-मुंबई मार्गे नागपूर या मार्गावर "गो एअर' या कंपनीची विमानसेवा सुरू झाली आहे.

आठवड्यातून दोन दिवशी ही सेवा असून एकाच दिवशी प्रस्थान व आगमन अशी सोय असल्याने या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुता गद्दीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या वतीने येथील विमान तळाचा विकास करण्यात आला. विमान तळासाठी लागणाऱ्या बहुतेक अद्ययावत सुविधा येथे उपलब्ध आहेत. मागील वर्षी किंगफिशर या विमान कंपनीने नांदेड-लातूर-मुंबई या मार्गावर आठवड्यातून तीन दिवस (सोमवार, बुधवार व शुक्रवार) विमानसेवा सुरू केली. या सेवेला प्रारंभी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने काही कालावधीत खंड पडून आता ती पुन्हा नियमित सुरू झाली आहे. दरम्यान, येथील विमानतळाचे व्यवस्थापन शासनाने रिलायन्स कंपनीकडे सोपविले आहे.

नांदेडला धार्मिक पर्यटनाचे प्रमाण अधिक असून त्यातही गुरुद्वारामुळे पंजाब प्रांतातील भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे या भाविकांना सोयीचे होईल, या दृष्टीने विमान सेवेची गरज ओळखून "गो एअर' या कंपनीशी करार करण्यात आला आहे. दिल्ली-नागपूर-नांदेड-मुंबई अशा या सेवेत नांदेड आता देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या दोन मेट्रोपॉलिटीन शहरांशी जोडले गेले आहे. शिवाय ही विमानसेवा आठवड्यातून मंगळवार आणि गुरुवार अशी दोन दिवस असल्याने आठवड्यातील पाचही कार्यालयीन दिवशी मुंबईला जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

मंगळवारी (ता. सहा) सकाळी नऊच्या सुमारास हे विमान दिल्लीहून नांदेडला पोचले. दिल्ली येथून या विमानाने 173 प्रवासी आले. येथील विमानतळावर त्याचे स्वागत करण्यात आले. नऊ वाजून 53 मिनिटांनी त्याने मुंबईकडे झेप घेतली. याद्वारे नांदेड येथून मुंबईला 72 प्रवासी गेले आहेत. त्यात माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, आमदार डी. पी. सावंत, ओमप्रकाश पोकर्णा, रावसाहेब अंतापूरकर, माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, एमआयडीसीचे जॉईंट सेक्रेटरी राधेश्‍याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी एच. व्ही. आरगुंडे, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे आदींसह इतरही प्रवाशांचा समावेश आहे. बरोबर एका तासाने ते मुंबईला पोचले.


-- Esakal