Tuesday, March 31, 2009

एप्रिल फूल !

मित्रांनो, उद्या एक एप्रिल.
तेव्हा जरा जपूनच राहा कारण तुमच्या मित्र-मैत्रिनींना उद्याच्या दिवशी तुमच्यात एक बकरा दिसायला लागतो.


मित्रांनी एप्रिल फूल बनविलं तरी ते खिलाडूवृत्तीने स्विकारा, त्यातच खरी मज्जा आहे.


आणि फक्त स्वतःच होऊ नका एप्रिल फूल, त्यांनाही बनवा !


जगात सगळ्यात प्रसिद्ध झालेले एप्रिल फूलचे काही क्षणचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Monday, March 30, 2009

राहुल गांधी उद्या नांदेडात.





काय नांदेडीअन्स, अनुभवताय ना निवडणुकीचे वारे ?


भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि रिपाइंचे अधिकृत उमेदवार आमदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या प्रचारासाठी अ. भा. कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व युवा नेते खासदार राहुल गांधी हे नांदेडमध्ये येणार आहेत.


त्यांची जाहीर सभा ३१ मार्च २००९ रोजी नांदेड शहरात सकाळी १० वाजता होणार आहे. (देशमुख कॉलोनी, कापुस संशोधन केंद्राच्या समोर.)



कालच मुख्यमंत्र्यांचा प्रचारासाठी रोड शो झाला, आज गोपीनाथ मुंडे येणार आहेत, उद्या राहुल गांधी येणार आहेत आणि अजून काही दिवसांनी नरेंद्र मोदीसुद्धा नांदेडला येणार आहेत.



मुख्यमंत्र्यांचे शहर म्हणून सगळ्या महाराष्ट्र तसेच देशाचे लक्ष नांदेड मतदारसंघाकडे लागून राहिलेले आहे.

सर्व पक्षांनी इथली निवडणुक प्रतिष्ठेची बनवून टाकली आहे.




मतदानाचा अधिकार वापरा आणि योग्य उमेदवारालाच निवडुण आणा.



भाजप नेते गोपीनाथ मुंडे आज नांदेडमध्ये




भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नांदेड लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज (३० मार्च २००९) रोजी इंदिरा गांधी मैदानावर सकाळी ११ वाजता जाहीर सभा आयोजीत करण्यात आली आहे.


Friday, March 27, 2009

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आमच्या तमाम वाचकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .
हे नववर्ष तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीचे जाओ .




Tuesday, March 24, 2009

नरेंद्र मोदी यांची नांदेड येथे सभा

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे येत्या २८ मार्च रोजी नांदेड येथे लोकसभा निवडणूकींसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.

सभेची तारीख जरी घोषीत केली गेली असली तरी सभेची वेळ अजून निश्चीत नाहीये.

सभेच्या ठिकाण आणि वेळेबद्दल आपल्याला लवकरच माहिती देण्यात येईल.


ता.क. (२५-०३-०९) :-
नरेंद्र मोदी यांच्या सभेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
त्यांची जाहिर सभा आता २८ मार्चऐवजी एप्रीलच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

Saturday, March 14, 2009

नांदेडमध्ये संचारबंदी

शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर जमावाने दगडफेक केल्यामुळे शुक्रवारी रात्री शहरात तणावनिर्माण झाला. दगडफेकीत तीन नागरिकांसह सात पोलिस जखमी झाले असून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनातकरण्यात आला आहे. दगडफेकीनंतर संतप्त जमावाने आठ वाहने जाळली असून, खबरदारीचा उपाय म्हणूनशनिवारी पहाटेपर्यंत शिवाजीनगर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
शिवसेनेतर्फे शुक्रवारी शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. रात्री पावणेनऊच्या सुमारास मिरवणूकशिवाजीनगर भागात आली, तेव्हा एका प्रार्थनास्थळाच्या परिसरात असलेल्या जमावाने मिरवणुकीवर दगडफेककेली. त्यानंतर मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनीही दगडफेक केली.
सुमारे ३० ते ३५ दुकानांवरही दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत आमदार श्रीमती खेडकर यांच्या गाडीचेहीनुकसान झाले. जमावाने जीप, ऑटो आणि दुचाकी अशी आठ वाहने जाळली. त्यामुळे दगडफेकीमुळे जमावालापांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ३५ जणांना अटक केली आहे. पोलिस दलासह राज्य राखीव दल दंगल नियंत्रण पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

(
सकाळ वृत्तसेवा
Friday, March 13th, 2009 AT 11:03 PM)




शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर मिरवणुक आली त्यावेळी पोलीसठाण्यासमोरील नवी आबादी भागातून एका धार्मिक स्थळालगत जमावाने अचानकपणे मिरवणुकीवर तुफान दगडफेक सुरू केली.
काही पेट्रोलबॉंबही मिरवणुकीवर येऊन पडले.
अचानकपणे दगडफेक सुरू झाल्यामुळे मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी नवी आबादीच्या बाजूने दगडफेक केली.
यावेळी दोन्ही बाजूचे जमाव आमने - सामने भिडले त्यामुळे परिस्थीती आणखीनच चिघळली.

--- प्रजावाणी (शुक्रवार, मार्च १३, २००९)





नांदेड शहरातला सर्वात संवेदनशील भाग म्हणून हा परीसर कुप्रसीद्ध आहे.
शिवाजनगर पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच हा भाग असला तरी काही वेळासाठी का होईना पण प्रत्येक वेळेस परिस्थीती ही नियंत्रणाबाहेर जातेच.

नांदेडमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक अतिशय सलोख्याने राहतात पण काही समाजकंटकांमुळे अशा मिरवणुकींवर दंगलींचे ढग उत्तरोत्तर गडदच होत चालले आहेत.






ता.क. :- (शुक्रवार, मार्च १३, २००९ सकाळचे ७ वाजून २५ मिनीटे)

काल रात्री जमावाने जवळपास २० वाहनांना आग लावल्याचे समजते.
काल शुक्रवारच्या आठवडी बाजारातसुद्धा सगळीकडे धावपळीचे आणि भितीचे वातावरण होते.
आत्ता सकाळीसुद्धा बहुतांश नांदेडीअन्सनी घरीच थांबने पसंत केले आहे.
रस्त्यांवर अगदी संचारबंदीसारखी परिस्थीती दिसून येत आहे.

Tuesday, March 10, 2009

होळी आणि धूलिवंदनाच्या शुभेच्छा !

आली रे आली,होळी आली..

चला,आज पेटवुया होळी..

नैराश्याची बांधून मोळी..

टाकुन द्या त्यात

आयुष्याच्या..

अडचणी,चिंता,मनाचा गुंता..

करु होम दु:ख,अनारोग्याचा..

नवयुग होळीचा संदेश नवा..

झाडे लावा,झाडे जगवा..

करुया अग्निदेवतेची पुजा..

होळी..केरकचरा,गोव-यांनी

सजवा..

दाखवुन नैवद्य पुरणपोळीचा..

मारुया हाळि..

होळी रे होळी, पुरणाची पोळी..

करु आनंदाने साजरी होळी..

( - अनामिक )

धूळवंड साजरी करा मित्रांनो पण एकमेकांना रंग लावताना जरा काळजी घ्या.

सुरक्षित धूलिवंदन साजरे करा.

नांदेडीअन्सच्या तमाम वाचकांना होळी आणि धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.



Monday, March 9, 2009

मतदानाचा अधिकार

होय मित्रांनो,
नुकताच मला मतदानाचा अधिकार मिळाला आहे आणि मी त्याचा पुरेपूर वापर करून घेणार आहे योग्य व्यक्तीला निवडून आणन्यासाठी.

हो, मला माहित आहे की माझ्या एकट्याच्या मताने ती योग्य व्यक्ती काही निवडून येणार नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे ?

आणि जर आपण सर्वांनी मिळून त्या योग्य व्यक्तीला निवडून आणायचे ठरविले तर काय माहित आपल्या सगळ्य़ांच्या मतांमुळे ती व्यक्ती निवडून येईलसुद्धा.


आता मला हे मात्र माहित नाही की आपल्या कम्युनिटीमध्ये किती लोकांकडे मतदानाचा अधिकार आहे आणि किती लोक त्याचा उपयोग करून घेतात.


माझी तरी मतदानाची ही पहिलीच वेळ असणार आहे, आणि मी मतदान करणारच.
जे सुशिक्षित, सुसंस्कृत नांदेडीअन्स राजकारनावर फक्त्त बोलतात व टिका करतात आणि मतदानाचा अधिकार मिळवूनसुद्धा मतदान करत नाहीत त्यांना माझी विनंती की चला आजपासून मतदान करूयात आणि योग्य व्यक्तीच निवडून येईल याची काळजी घेऊयात.






लक्षात ठेवा, तुम्ही मतदान करत नाही म्हणूनच अपात्र उमेदवार निवडणूक जिंकतात.
तुम्ही जर मतदान करत नसाल तर राजकारण आणि राजकारणी यांच्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही.






टीप :- ती योग्य व्यक्ती कोण हे प्रत्येकाने आपले आपले ठरवून घ्यावे.

Wednesday, March 4, 2009

गोरठा (खास वाचकांच्या आग्रहास्तव)


नमस्कार
मित्रांनो,
आपल्या ब्लॉगच्या दोन वाचकांनी आणि माझ्या काही मित्रांनी मला गोरठा ह्या गावाबद्दल माहितीपूर्ण लेख लिहायला सांगितला होता. (योगायोगाने गोरठा हे माझे गाव आहे.)
मला गोरठ्याबद्दल तसेच पर्यायाने संत श्री. दासगणू महाराज यांच्याबद्दल लिहायला मिळत आहे हे मी माझे भाग्यच समजतो.


गोरठा हे गाव नांदेडपासून फक्त ४० किलोमीटर अंतरावर आहे.
गोरठा येथे संत श्री. दासगणू महाराजांची वस्त्रसमाधी आहे.
संत श्री. दासगणू महाराजांचे संपूर्ण नाव गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे आहे.
त्यांचा जन्म १८६७ मध्ये अकोळनेर येथे झाला.


पुढे त्यांनी पोलिसाची नौकरी केली.
यादरम्यानच त्यांना त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहिसलामत सुटले.
तेव्हापासून त्यांची अशी धारना झाली की देवानेच आपल्याला वाचविले.


मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले.
त्यांनी पोलिसाची नौकरीसुद्धा सोडली.
ते शिर्डीच्या साईबाबाला आपल्या गुरूस्थानी मानत.
दासगणू महाराज फार छान पद्यरचना करायचे.
त्यांनी अनेक संतांची चरित्रेसुद्धा लिहीली.


१९६२ मध्ये दासगणू महाराजांनी पंढरपूर येथे देह ठेवला, पण गोरठ्यातील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्यांचे समाधीमंदीर इथेच गोरठ्यात बांधण्यात आले.
हे मंदीर दोन मजली आहे.
खालच्या भागात दासगणू महाराजांची समाधी आहे तर वरच्या मजल्यावर ध्यानगृह आहे.
या ध्यानगृहात विष्णू-नारायनाचे अत्यंत सुंदर व सुबक असे तैलचित्र आहे.


गोरठ्यातले दुसरे संत म्हणजे स्वामी वरदानंद भारती.
वरदानंद भारती हे संत दासगणू महाराजांचे दत्तकपुत्र होते.
त्यांनी गोरठ्यामध्ये अध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक अशी अनेक कामे केली.
इतकेच नव्हे तर ते किर्तन, प्रवचन करण्यासाठी भारतभर फिरत.
स्वामी वरदानंद भारती यांनी ५ सप्टेंबर २००२ रोजी उत्तरकाशी येथे देह ठेवला.
स्वामी वरदानंद भारती हे प्रसिद्धीपासून नेहमी दूरच राहिले त्यामुळे त्यांच्या कार्याची लोकांना फारशी माहिती झाली नाही.



गावात दरवर्षी एक छोटीशी जत्रादेखील भरते.
जत्रेच्या दिवशी सर्व ग्रामस्थ मंडळी ८ ते १० कि.मी. दूरवरुन आपापल्या कावड्यांत गोदावरी नदीचे पाणी आणून पुजारी महाराजांकडे सोपवितात आणि मग पुजारी महाराज गोदावरीच्या त्या पवित्र पाण्याने समाधिचा अभिषेक करतात.
या जलाभिषेकादरम्य़ान पुजाऱ्यांशिवाय कुणालाही आत येण्याची परवानगी नसते.


सध्या मंदीराची सगळी व्यवस्था श्रीमती गार्गी देशपांडे ह्या पाहात आहेत.
कौमार्यव्रताचे पालन करून गेली अनेक वर्षे संस्थानातर्फे चालणाऱ्या सर्व कामांचे नियोजन त्या करीत आहेत.


३-४ वर्षांपूर्वी मंदीराच्या मागच्या बाजूस संजीवन नावाची एक वास्तू बांधली आहे.
या इमारतीत स्वामी वरदानंद भारती यांच्या विविध छायाचित्रांचा संग्रह केला आहे आणि त्यातून त्यांचा जीवनपट दाखविला आहे.


मंदीरात फोटो काढण्यास मनाई आहे, पण विचार करण्याची बाब ही आहे की संजीवर ही वास्तू पूर्णतः छायाचित्रांवरच अवलंबून आहे.
जर त्या काळी त्या फोटो काढल्या नसत्या तर आज संजीवन सारखी नितांतसुंदर अशी वास्तू उभीच राहिली नसती.


तर असे आहे आमचे गाव.
हा लेख वाचून एखादा व्यक्ती जरी गोरठ्यात गेला तर ह्या लेखाचे सार्थक झाले असे मी समजेन.




माझ्या गोरठे गावात
हळू उतरे पहाट
अप्पाजींची मंगल वाणी
आम्हा दाखविते वाट.

माझ्या गोरठे गावात
शांतवितसे ओहोळ
प्रवृत्ती निवृत्ती काठ
भक्तिरस त्यात जळ.

माझ्या गोरठे गावाला
बाळेराजाची राखण
कपाशीत उतू जाई
कोजागिरीचं चांदणं.

गावभागी शिरावरी
ध्वज डोलतो केशरी
मरगळल्या मनाला
पुन्हा येतसे उभारी.

माझ्या गोरठे गावाची
असे एकच माऊली
दासगणूची ही कृपा
जशी शीतळ साऊली.

माझ्या गोरठे गावात
आता आकारती शब्द
बोल बोबडे ऎकण्या
वारा होतसे निशब्द.

माझ्या गोरठे गावात
नांदो लक्ष्मी - सरस्वती
राहो एकतेची याद
दूरवर जावो कीर्ती.

(कविता :- डॉ. सुरेश सावंत यांच्या दुभंग ह्या कवितासंग्रहातून साभार)