Saturday, November 28, 2009

सकाळ रिफ्लेक्शन्स २००९

छायाचित्रण कलेला व्यासपीठ देण्यासाठी "सकाळ' माध्यम समूहातर्फे "रिफ्लेक्‍शन्स 09' ही स्पर्धा व प्रदर्शन "इंडिया आर्ट गॅलरी'च्या सहयोगाने आयोजिण्यात येते.
या छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचा उत्तरार्ध डिसेंबर महिन्यात होणाऱ्या प्रदर्शनाने संपन्न होणार आहे.
या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.

यंदा या स्पर्धेसाठी प्रवेशिका येत्या 26 ऑक्‍टोबरपासून उपलब्ध होणार असून, 30 नोव्हेंबरपर्यंत स्पर्धेतील सहभागासाठी प्रवेशिका दाखल करता येतील.
स्पर्धेच्या प्रवेशिका "सकाळ'ची कार्यालये, इंडिया आर्ट गॅलरी; तसेच www.esakal.com आणि www.indiaart.com या संकेतस्थळांवर विनामूल्य उपलब्ध असतील. www.indiaart.com या संकेतस्थळावरून
येणाऱ्या प्रवेशिका ऑनलाइनही स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धेसाठी यंदा-
1) स्त्री,
2) मुलं - उद्याची आशा आणि
3) गर्दीपलीकडचा निसर्ग असे विषय असणार आहेत.

या स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज "सकाळ' कार्यालयात देण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंत असणार आहे.
डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्रदर्शनात स्पर्धेतील निवडक छायाचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत, त्यासमवेत नामवंतांची व्याख्याने व प्रेक्षकांबरोबर प्रत्यक्ष संवादाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे "ब्रॅंड ऍम्बेसिडर' म्हणून दर वर्षीप्रमाणे नामवंत छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष काम पाहणार आहेत.



मी एक नवखा फोटोग्राफर असूनही या स्पर्धेत भाग घेतला आहे.
मी स्पर्धेसाठी पाठवलेले फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

सकाळ रिफ्लेक्शन्स २००९

Thursday, November 26, 2009

हिवाळ्याची चाहूल

नमस्कार मित्रांनो,
जाम थंडी वाजते आहे ना ?

तसा उशीराच आलाय म्हणा यावेळी हिवाळा.

सोमवारी (२३-११-०९) तापमान ११ अंश सेल्सीअस होते म्हणे. (अच्छा, म्हणून त्या दिवशी शेजारच्या आज्जी-आजोबांची कवळी इतकी वाजत होती तर.)


तापमानाचा हा पारा काही दिवसांत ८ अंशापर्यंतही घसरण्याची शक्यता आहे असा अंदाज महात्मा गांधी मिशनच्या अंतराळ व खगोलशास्त्र विभागाचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी वर्तविला आहे.

तेव्हा थंडीने अजून कुडकुडायला सज्ज व्हा.

Friday, November 20, 2009

ट्रॅफिकवाल्या मामांना एक अनावृत्त पत्र.

नमस्कार मामा,
    आज परत वाहतूकीचे हाल-हवाल पाहण्यासाठी राऊंडवर जाऊन आलो.
काही विशेष नाही हो, उगीच आपली एक भाबडी आशा की ट्रॅफिकला शिस्त लागली असेल आजपासून.

    मामा, कालचा लेख वाचून माझे मित्र मला काय म्हणाले माहित आहे का ?
ते म्हणाले की, "तुझं कसं रे लक्ष गेलं सिग्नल्सकडे ? आम्हाला तर माहित देखील नव्हतं की ही खांब्यावरची लाईटींग सुरू झाली आहे म्हणून."
आत्ता बोला !
किती पांचट जोक मारतात नाही ?
जाऊ देत, त्यात त्यांचा तरी काय दोष म्हणा ? त्यांना लहाणपणीच मास्तरांनी शिकवलंय की निर्जीव वस्तूंमध्ये कसलिही हालचाल होत नसते.
इतके दिवस हे सिग्नल्सचे खांबे धूळखात पडूनच होते ना, त्यामुळे मित्रांना कसे कळणार की या निर्जीव वस्तूमधे सजिवांना थांबवण्याची ताकद आहे.

    काल असाच मी रेड सिग्नल लागल्यामुळे गाडी बंद करून थांबलो होतो, पण माझ्या मागून येणार्‍या गाड्या तशाच पुढे जात होत्या.
एक दोघे तर माझ्याकडे पाहून इतक्या कुत्सीतपणे हसले की बस्स. मला तर मेल्याहून मेल्यासारखे झाले.
रेड सिग्नलवर थांबणे म्हणजे बेशिस्त की थांबलेल्यावर हसणे म्हणजे शिस्त हे तुम्हीच सांगा आता.

    लक्ष्मिकांत बेर्डेचा एक चित्रपट होता, त्यात त्याला लाल रंग दिसला की त्याची सगळी शक्ती निघून जायची पण आपल्या नांदेडीअन्सचे याच्या उलटे आहे.
त्यांना ट्रॅफिक सिग्नलचा लाल रंग दिसला की त्यांच्या अंगात शक्ती संचारते जी त्यांना वाहतूकीचे नियम मोडायला प्रवृत्त करते.

असं काय करता मामा ?
अहो पुण्या-मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलमधला लाल रंग नांदेडच्या ट्रॅफिक सिग्नलपेक्षा जास्त गडद आहे का ?
नाही ना ?
मग नांदेडचीच वाहतूक इतकी बेशिस्त का ?
का बरे थांबत नसतील नांदेडीअन्स रेड लाईट लागल्यावर ?


    ट्रॅफिक सिग्नलचे सोडा मामा, ते तरी शिट्टी वाजवून नियम मोडणार्‍याला अडवू शकत नाहीत पण तुम्ही तर आहात ना ? (खरं पाहता तुम्ही कुठे असता हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो.)
पण माझे ते दुष्ट मित्र आहेत ना, ते मला नेहमी सांगत असतात की तुम्ही ट्रॅफिक सिग्नलच्या आसपासच्या हॉटेलात हमखास आढळता म्हणे.
काय मामा, तुम्हीच असं करत असाल तर सामान्य जनतेकडून वाहतूकीचे नियम पाळल्या जाण्याची अपेक्षा ठेवणे म्हणजे गुन्हाच होईल की !

कालच माझे मित्र म्हणाले की, ’चल तुला जादू दाखवतो.’
मी म्हणालो , ’कसली जादू’ ?
जादूचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी ते मला त्यांच्या सोबत घेऊन निघाले..
कधी नाही ते पुढे चौकात तुम्ही उभे होतात.
माझे मित्र म्हणाले, "चौकातून ट्रिपल सीट जाताना आम्ही अदृष्य होऊन दाखवतोत."
मी तर चक्रावून गेलो त्यांचे बोलणे ऎकून. मला काहीच कळाले नाही ते काय बोलत होते ते.
एव्हढ्यात ते गाडीवर ट्रिपल सीट बसून तुमच्या पुढून आरामात, सावकाश निघून देखील गेले.
माझ्याजवळ परत येऊन ते म्हणाले, "बघ झालो होतोत की नाही आम्ही अदृष्य ?"
"अरे मला तर तुम्ही दिसत होतात", माझे उत्तर.
तर ते म्हणाले, "ट्रॅफिकवाल्या मामाला दिसलोत का ? दिसलो असतो तर त्यांनी अडवलं नसतं का आम्हाला ?"
परत इतका पांचट जोक ऎकून मी कप्पाळावर हात मारून घेतला.


डी.वाय.एस.पी. ऑफिसमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही "ट्रॉफिक" सिग्नल्सची माहिती देणारा एक बोर्ड ठेवलाय, त्या ठिकाणी किती जणांचे लक्ष जाईल हे तुम्हीच प्रामाणिकपणे सांगा.

    आज तुम्ही दादर्‍यावर वाहतूकीला नियंत्रीत करण्याचा प्रयत्न करत होतात. तुमच्या मागून-पुढून ऑटोरिक्षावाले अगदी स्टंट मारल्यासारखे ऑटॊ चालवत होते.
एक ऑटॊ तर तुम्हा-आम्हाला मच्छर समजून मनपाच्या त्या मच्छर मारण्याच्या गाडिलाही लाजवेल इतका धूर सोडत जात होता.
त्या वेळी PUC नावाची काहीतरी गोष्ट असते असे कुठेतरी वाचल्याचे आठवले पण तुम्ही त्याला एका शब्दानेही बोलला नाहीत म्हणजे माझ्याच वाचण्यात काहीतरी चुकीची माहिती आली असेल.
    खरं सांगतो मामा, पेपरला जेव्हा वाचतो ना की अमूक एका ऑटोवाल्याने तुम्हाला मारले, तेव्हा फार वाईट वाटतं हो.
अहो ट्रॅफिकवाले आहात म्हणून काय झालं, तुम्हीही पोलीस मामाच आहात की !

    तिथून पुढे आलो तर I.T.I. कॉर्नरला तुम्ही बहुतेक तुमच्या गावाकडच्या माणसाला बोलत उभे होतात.
तसं नाही, तुम्ही त्यांच्याशी भररस्त्यात त्यांना त्यांची गाडी थांबवायला लावून मनसोक्त गप्पा मारत होतात म्हणून सहज आपला एक अंदाज लावला हो !


    खरं सांगतो मामा, एव्हढा सगळा लेखन प्रपंच तुमचा अपमान करण्यासाठी मुळीच लिहीला नाही हो.
लोकांच्या मनात दहशत बसवायला सांगत नाहीये मी, पण निदान आदरयुक्त भिती असायलाच हवी.

    नांदेडीअन्सना वाहतूकीचे नियम मोडायचा कसलाही छंद नाहीये मामा, तुम्ही फक्त थोडं मनावर घ्या आणि मग बघा आपले नांदेडीअन्स तुम्हाला साथ देतात की नाही.



 
तुमचा एक नांदेडीअन भाचा,
सौरभ सावंत.

Tuesday, November 17, 2009

ट्रॅफिक सिग्नल्स की वाहतूकीच्या दुर्दशेचे सिग्नल्स ?

स्थळ :- चिखलवाडी कॉर्नरजवळील ट्रॅफिक सिग्नल.
ट्रॅफिकवाले मामा :- अनुपस्थीतीत.
रेड लाईटला कुणी थांबतंय का ? :- अक्षरश: कुणीही नाही.
तात्पर्य क्रमांक १ :- नांदेडीअन्सना माहित आहे की ट्रॅफिक सिग्नल हे ट्रॅफिकवाल्या मामांसारखे पावती फाडू शकत नाही.


स्थळ :- आय.टी.आय. कॉर्नर.
ट्रॅफिकवाले मामा :- उपस्थीत.
त्यांना कुणी जुमानतंय का ? :- फारच कमी लोक.
तात्पर्य क्रमांक २ :- ट्रॅफिक सिग्नल्सऎवजी ट्रॅफिकवाल्या मामांना थांबविले तरी काही जास्त फरक पडत नाही.


स्थळ :- आय.टी.एम. कॉलेजपुढील ट्रॅफिक सिग्नल.
ट्रॅफिकवाले मामा :- अनुपस्थीत. (अशोकराव येऊन गेलेत ना ! आता कशाला थांबतील ट्रॅफिकवाले मामा इथे ?)
रेड लाईटला कुणी थांबतंय का ? :- कुणीही नाही.
तात्पर्य क्रमांक ३ :- नांदेडीअन्स दररोज वृत्तपत्र वाचतात, ज्यातून त्यांना कळतं की अशोकरावजी चव्हाण हे नांदेडमध्ये कधी येणार आहेत.


महातात्पर्य = उद्या सगळेच नांदेडीअन्स ट्रॅफिक सिग्नलकडे ट्रॅफिक सिग्नल म्हणून न पाहता दिवाळीची रोषणाई म्हणून पाहायला लागले तर आश्चर्य वाटायला नको.

Monday, November 16, 2009

स्वाईन फ्लूचा पहिला बळी

नांदेड, १५ नोव्हेंबर/वार्ताहर
 

‘स्वाइन फ्लू’मुळे शहरातील संगीता कोंडेकर या महिलेचा मृत्यू झाला असून नागरिकांनी या आजाराबाबत दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले आहे.

श्रीमती कोंडेकर यांच्या आजाराबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, १ नोव्हेंबर रोजी त्यांना ताप आल्यामुळे असर्जन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथेही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने पुन्हा ४ नोव्हेंबरला अन्य एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ८ नोव्हेंबरला लोटस हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार करून त्याच दिवशी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना ‘स्वाइन फ्लू’ झाल्याचे निदान झाले. परिणामी उपचारास विलंब लागल्याने १४ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांना मधुमेह असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमी होती. खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात जाण्याचा तात्काळ सल्ला दिला असता तर त्या वाचल्या असत्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

‘स्वाइन फ्लू’ची तीव्रता कमी झालेली नसून हिवाळ्यामुळे तो आणखी वाढण्याची शक्याता आहे. 

त्यामुळे ज्या रुग्णांना ताप, सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे अशा तक्रारी असतील त्यांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले आहे. 

नांदेडचे श्री गुरूगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय, शिवाजीनगर भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र यापाठोपाठ जिल्ह्य़ातील सर्व तालुकापातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयात उपचाराची सोय आहे. पुरेशी औषधी, टॉमी फ्लू गोळ्या तसेच मास्कही उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 लोकसत्ता - मराठवाडा वृत्तांत (१६ नोव्हेंबर ०९)