Tuesday, January 26, 2010

अपरंपार



नाही, मी कुणा साधू-संताच्या महिमेबद्दल नाही सांगत आहे.
हे एका ठिकाणाचे नाव आहे.


काही दिवसांपूर्वी ऑर्कूटवर एका मित्राने मला ह्या ठिकाणाबद्दल सांगितले होते.
त्याने या ठिकाणाचे इतके चांगले वर्णन केले होते की, मी तेव्हाच ठरवलं होतं, या ठिकाणाला भेट द्यायचीच.


त्याने दिलेल्या माहितीवरून जेव्हा आम्ही मित्र अपरंपारच्या डोंगरावर पोहोचलो, तेव्हा कळालं की तो ऑर्कूटवरचा मित्र या ठिकाणाबद्दल इतके भरभरून का बोलत होता.




मित्रांनो, तुम्हीसुद्धा अपरंपारला गेलात तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की नांदेडच्या अगदी जवळ इतकं विलोभनीय, रमणीय आणि त्याचमुळे प्रेक्षणीय ठिकाण असू शकेल.


आता जास्त काही लिहीत नाही अपरंपारबद्दल.
तुम्ही स्वतः तिथे एकदा जाऊनच या.




ठिकाण :- अपरंपार


वैशिष्ट्ये :- गर्द वनराई, शहरी गोंगाटापासून दूर, नांदेडपासून फक्त ३५ कि.मी.

एक दिवसाची सहल काढण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण.


कसे पोहोचाल ? :- नांदेडहून भोकर फाट्याला जा, तिथून उजवीकडे बारड रस्त्याला लागा.

बारडच्या थोडसं पुढे पाटनूर या गावाची पाटी लागेल. (ही पाटी भोकर फाट्यापासून बरोबर १८ कि.मी.वर आहे.)

या पाटीपासून डाव्या हाताला जो रस्ता जातो, तोच रस्ता तुम्हाला अपरंपार मंदिरापर्यंत घेऊन जाईल.

पाटनूर पाटी ते अपरंपार मंदिर हे ७ कि.मी. चे अंतर आहे.


नोट :- पाटनूर पाटी ते अपरंपार मंदिरादरम्यानचे अंतर नीट लक्षात ठेवा कारण रस्त्यात कुठेही मार्गदर्शक फलक लावलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही चुकून पुढे निघून जाऊ शकता.

अपरंपार मंदिराला जाताना पाणी आणि खाण्याचे पदार्थ घरूनच घेऊन जा कारण वर पाणी आणि जेवणाची सोय नाहीये.

आणि कृपया इतक्या निसर्गरम्य ठिकाणी पॉलिथीनच्या कॅरीबॅग वगैरेसारखा कचरा करू नका.


भेट देण्याचा उत्तम काळ :- जुलै ते नोव्हेंबर.

उन्हाळ्यात जाण्याचा विचारही करू नका.



काही फोटो :-
या फोटो पानगळीच्या काळात काढलेल्या आहेत.

फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !



राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी भारतीय जनतेला उद्देशून काल जो संदेश दिला, त्याच्यापेक्षा चांगला संदेश दुसरा कोणताच असू शकत नाही.


पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी तिच्या स्त्रोत्रांचा योग्य व आवश्यक तेव्हढाच वापर केला पाहिजे.
वनसृष्टी व प्राणीमात्रांचे संवर्धन करून पर्यावरणासाठी पोषक पावले उचलायला हवीत.





प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा !
जय हिंद !

Saturday, January 23, 2010

वाहतूक शाखा आणि मनपाचा धुमधडाका


माफ करा मित्रांनो, हा ब्लॉगपोस्ट लिहीण्यास खूप उशीर झाला माझ्याकडून.
असो, कुणीतरी म्हटलेलंच आहे 'Better late than never'.


हा ब्लॉगपोस्ट मी नांदेड शहर मनपा आणि वाहतूक शाखेला मनापासून अर्पण करतो.
मनापासून हा शब्द मुद्दामहून वापरलाय, कारण काय आहे आजकाल प्रत्येक जण माझ्या प्रत्येक वाक्यात टोमणाच शोधू लागला आहे.
अरे चांगल्या कामासाठी चांगलेच लिहीतो आम्ही.


मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की वाहतूक सुरक्षा सप्ताह ७ जानेवारी २०१० ला संपला. (अधिक माहिती.)
८ जानेवारी २०१० रोजी वाहतूक शाखा आणि मनपाने जो धुमधडाका सुरू केला, तो आजही सुरूच आहे.
तुम्ही विचार करत असाल की मी काय हे सारखं सारखं धुमधडाका, धुमधडाका लावलंय.
अहो तुम्हाला जेव्हा पूर्ण बातमी कळेल तेव्हा तुम्हीही या सगळ्या प्रकरणाला वाहतूक शाखा आणि मनपाचा धुमधडाकाच म्हणाल. (चांगल्या अर्थाने.)

त्याचे काय आहे, ८ जानेवारी २०१० रोजी फूटपाथ मोकळे करणे, अतिक्रमण हटविणे, वाहनांच्या नंबरप्लेट नियमानुसार करून घेणे आणि नागरिकांना शिस्त लावणे इत्यादी कामांसाठी पोलीस आणि मनपा यांच्यातर्फे एक मोहिम हाती घेण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत भरपूर वाहनांची चेकींग करण्यात आली, हातगाडेवाल्यांना रस्त्यावरून हटवण्यात आले, जागोजागी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.
यात पोलिस प्रशासनाचे २०५, मनपाचे १०० व आर.टी.ओ.चे काही अधिकारी असे जवळपास ३२५ जण होते.

सगळ्यांना वाटलं की चहूबाजूंनी होणार्‍या टिकेमुळे वाहतूक शाखेने एक दिवसाचा पब्लिसिटी स्टंट आखला असेल.
पण दिवसेंदिवस हा वाहतूक सुधार कृती कार्यक्रम अधिकाधिक कडक होत गेला तेव्हा लोकांना याची गंभिरता आणि महत्त्व पटले.
९ तारखेला तर कलामंदीर परीसरातील हातगाडेवाल्यांनी पोलिसांवरच दगडफेक केली.
पोलीसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळावर उपलब्ध होता म्हणून बरे झाले, नाहीतर परिस्थीती अजून बिघडली असती.
१४ तारखेला अण्णा भाऊ साठे चौकातसुद्धा पोलिसांत आणि हातगाडेवाल्यांमधे बाचाबाची झाली होती.
पोलिंसाचा अतिक्रमण दूर करण्याचा ठाम निश्चय पाहून नंतर काही व्यापार्‍यांनी नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण केलेल्या जागेवरून स्वतःहून आपले सामान दूर केले.





पोलिसांनी केवळ हातगाडेवाल्यांनाच टार्गेट केले नाही तर दुचाकीधारकांकडूनही जबर दंड वसूल केला.
दुचाकीच्या फॅन्सी नंबरप्लेट्स बदलण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यासोबत एक पेंटरच ठेवला होता, नंबरप्लेट नियमानूसार करायला.
फॅन्सी नंबरप्लेट्स व नंबरप्लेट्स नसलेल्या वाहनांवर कार्रवाई करून ’दादा, बाबा, मामा, राज, काका’ असे लिहीलेले नंबरप्लेट्स काढून जागेवरच नवीन नंबरप्लेट बसवण्याच्या अभिनव उपक्रमामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
या एकाच दिवशी तब्बल ५०० नंबरप्लेट्सच्या केसेस सॉल्व्ह झाल्या म्हणे.

हळूहळू पोलिसांनी शहरातील अनेक भागांमधे हीच कार्रवाही सुरू ठेवली आणि त्याचे यथोचीत परीणामसुद्धा दिसायला लागले.
पुर्वी अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम लागायचे, पण या मोहिमेमूळे ट्रॅफिक जॅमच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.


:: दादरा ओव्हरब्रीज ::
दादरा ओव्हरब्रीजच्या कलामंदीरकडच्या टेकऑफ पॉईंटवर जे ऑटोवाले थांबतात त्यांच्यावर वाहतूक शाखेने, पोलिसांनी अजून काहीच कार्रवाई केलेली नाही.


:: फुटपाथ स्वतंत्र झाले ::
शहरात जागोजागी पाश्चात्य पद्धतीचे फुटपाथ बसवण्यात आले होते, पण या फुटपाथवर एकतर दुकानदारांनी किंवा हातगाडेवाल्यांनी अतिक्रमण केले होते त्यामुळे नाईलाजास्तव पादचार्‍यांना रस्त्यावरून चालावे लागायचे.
पण आता फुटपाथांवरचे अतिक्रमण काढल्यामुळे पादचारी आणि वाहनधारक दोघांनाही मदत झाली आहे.


एकूणच या धडक मोहिमुळे थोड्याफार प्रमाणात का होईना पण नांदेडच्या वाहतूकीला शिस्त मात्र लागली आहे हे नक्की.
पोलिसांनी ही मोहिम अजून काही दिवस अशीच सुरू ठेवली तर नांदेडीअन्सनाही वाहतूकीचे नियम पाळायची सवय लागेल आणि मग आपोआपच वाहतूकीला शिस्त लागेल.
पण पोलिसांनी ह्या मोहिमेत थोडी जरी ढिलाई दिली तर पहिले पाढे पंचावण्ण होणार यात काहीही शंका नाही.


:: श्रेय कुणाला ? ::
प्रत्येक वृत्तपत्र आता आपापल्या परीने ही मोहिम सुरू करण्याच्या प्रक्रीयेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे.
आपल्याला हे श्रेय लाटण्याचा भानगडीत पडायचे नाही पण तुम्हाला माहिती असावे म्हणून सांगतो :-

ऑर्कूटवर एक कम्युनिटी आहे, "Ashokrao Chavan" नावाची, ज्यात विपूल मोळके हेसुद्धा एक सभासद आहेत.
विपूल मोळके हे वार्ड क्रमांक २२ (गोकूळनगर) इथले नगरसेवक आहेत.
याच नांदेडमधल्या वाहतूकीच्या समस्येवर आम्ही त्या कम्युनिटीत चर्चा करत होतोत आणि त्यावर विपूल मोळके यांनी त्यांची प्रतिक्रीया दिली.
ते काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे इथे पेस्ट करतो.


"Dear saurabh i know that there is problem in the trafic signals thats not only in signal but also int the traffic of our city nanded
we means every one of nanded city shold have to follow the rules of traffic and after that only we can change the condition of traffic in nanded.
ok i will put this matter towards commissioner of nwcmc and sp of nanded as to attend u r matter and try to arrange the special meeting with both mla s of nanded ,commissioner , sp of nanded ,traffic pi of city myself , hon mayor of the city and all concern officers and hon cm also and if nessasery
thanks for complain "



२५ डिसेंबर ०९ रोजी त्यांनी हे आश्वासन दिलं आणि ८ जानेवारी २०१० पासून हा धडक कृती कार्यक्रम सुरू झाला.

आता याचे श्रेय कुणाला द्यायचे हे तुम्ही ठरवा.
वाहतूक शाखा आणि मनपाला, की नांदेडच्या वृत्तपत्रांना, की विपूल मोळके यांना, की जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांना, की अमिता भाभींना बेशीस्त वाहतूकीचा अनुभव देणार्‍या त्या ऑटॊचालकाला हे तुम्हीच ठरवा.
एक गोष्ट नक्की की या सर्व 'की' पैकी कोणतेही KEY लागलेली असली तरी फायदा मात्र नांदेडीअन्सचाच झाला आहे.

Thursday, January 14, 2010

तिळगूळ घ्या, गोडगोड बोला.


नांदेडीअन्सच्या तमाम वाचकांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !

तिळगूळ घ्या, गोडगोड बोला.



Tuesday, January 12, 2010

जानेवारीत पाऊस.

होय मित्रांनो, आज पाऊस पडला नांदेडमध्ये.
सकाळी ६ च्या सुमारास सुरु झालेला पाऊस जवळपास २ तास बरसत राहीला.

पाऊस इतका मुसळधार पडत होता की अगदी थोड्याच वेळात बहुतांश नाले ओव्हरफ्लो झाले होते. :P


या गूंड पावसाचा संबंधसुद्धा ग्लोबल वार्मिंगच्या टोळीशी तर नसेल ?

तुमच्याही मुलांच्या काळजात आहे एक कविता !


गेल्याच आठवड्यात एक उच्चविद्याविभूषित जोडपं भेटावयास आलं. या जोडप्याला एक लाडकी मुलगी आहे. अश्विनी तिचं नाव. ती पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकतेय. मुलीनं अभियंता व्हावं, ही आई-वडिलांची तीव्र इच्छा. त्यादृष्टीनं तिची मानसिक, शैक्षणिक जडणघडण झालेली.

आईचा मुलीवर भारी जीव. तिच्या शिक्षणकाळात तिच्याचजवळ राहता यावं, यासाठी तिच्या आईनं तीन वर्षंबिनपगारी रजा घेतली.

मुलीचं शिक्षण सुरू होतं. मध्यमवर्गीय पालकांना जबरदस्त धक्का बसावा, अशी एक गोष्ट उजेडात येते. ही लाडकी मुलगी अभ्यासात कमी आणि साहित्यलेखनात अधिक लक्ष घालत असे. साहित्यवाचनाचं तिला वेड लागतं. त्यातूनच ती कविता लिहायला लागते... सुंदर कविता... इंग्रजीतून कविता...

राजेंद्र जोगी सुरेखा जोगी... माझ्याबरोबर बोलत होते, तेव्हा माझ्या मनात कालवाकालव होत होती. हे जोडपं आता कथेचा शेवट कुठं करणार, याचा अंदाज मला येऊ लागला....गेले काही दिवस वैफल्यग्रस्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्या पाहून संशयाचे, काळजीचे अनेक ढग माझ्या मनात निर्माण होत होते.

'आमच्या मुलीला काहीतरी समजावा. ती अभियंता व्हावी, असं स्वप्न आम्ही बाळगलं...ही कविता मध्येच कुठून आली...? तिला तुम्हा समजावा... कवितेपासून दूर करा... अन्यथा तिचं करिअरकडं दुर्लक्ष होईल... आमची स्वप्नभंग पावतीलं...,'' अशी काहीतरी अपेक्षा ते व्यक्त करतील; मला कौन्सिलिंग करायला सांगतील, असा माझा अंदाज...

माझा अंदाज खोटा ठरवून हे जोडपं म्हणालं, 'आम्हाला आमच्या मुलीच्या कवितांचा अभिमान वाटतो. तिनं आपल्या कविता इंटरनेटवरून जगभरातील अनेक प्रकाशकांकडे पाठविल्या. त्यातील काहींनी विधायक प्रतिसाददिलांय... समजा कोठूनच मदत मिळाली नाही तर आम्ही तिचा काव्यसंग्रहही काढू.''

पालकांचं म्हणणं ऐकून मला आनंद वाटत होता; पण हे ते सारं मला का सांगताहेत, कळत नव्हतं. मी म्हणालो, 'तुमचे सारे निर्णय चांगले आहेत. मला का सांगत आहात हे सारं?''

ते म्हणाले, 'कोणाशी तरी शेअरिंग करायला पाहिजे म्हणून.''
मी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला; त्यांना खूप बरं वाटलं.

आपल्या भावी अभियंता मुलीच्या काळजात उगवलेल्या आणि उगवू पाहणाऱ्या अनेक कवितांचं संवर्धन त्यांनी करायचं ठरवलं. तिच्या सर्जनशीलतेला पाठिंबा द्यायचं ठरवलं. पालक म्हणून आपल्या स्वप्नाखाली तिची कविता चिरडू नये, असा निर्धार करण्याचंही ठरवलं.

'आमच्या मुलीच्या कविता एकदा वाचा,'' अशी विनंती करून जोडपं पाठमोरं झालं...
मी ठरवलं होतं, तिच्या कविता वाचण्याचं....मी डोळ्यांसमोर एक स्वप्नही रंगवत होतो... पालकांनी आपल्याच वाटांवर चालण्याची सक्ती आपल्या मुलांना केली नाही तर....? मुलांच्या ओंजळीत आणि त्यांच्या डोळ्यांत असलेल्या त्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचं ठरवलं तर...?
व्यवहारी पालक या निर्णयाचं स्वागत कसं करतील, माहीत नाही; पण या पालकांनी मात्र धाडस केलं आणि ते म्हणजे आपली स्वप्नं मुलीवर लादण्याचं..

(प्रा. राजेंद्र जोगी, मोबाईल क्रमांक - 9422754833)
(प्रा. सुरेखा जोगी, मोबाईल क्रमांक - 9422754933)



-- उत्तम कांबळे (मुख्य संपादक)
सकाळ वृत्तसेवा.



माझ्या मते त्या पालकांनी अतिशय योग्य निर्णय घेतला आहे.
Hats Off To Them !

त्या पालकांच्या निर्णयाबद्दल किंवा एकंदरीतच अशा प्रकारे उद्भवणार्‍या परिस्थींबद्दल तुमचे काय मत आहे ?

Monday, January 11, 2010

नांदेड रेल्वेस्टेशनमधे मल्टीफंक्शनल कॉम्प्लेक्स

रेल्वे मंत्रालयाच्या नवीन योजनेनुसार नांदेड रेल्वेस्टेशनला ८ करोड रूपये खर्चून एक मल्टीफंक्शनल कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे ज्यात हॉटेल, मेडिकल शॉप, पुस्तकालय अंडरग्राऊंड पार्कींग असणार आहेत.

या योजनेनुसार भारतातल्या १२ रेल्वेस्टेशन्सवर असे मल्टीफंक्शनल कॉप्लेक्स उभारण्यात येणार आहेत.
उदयपूर, म्हैसुर, रायपूर आणि देहरादून या रेल्वेस्टेशन्सवर फेब्रूवारी २०१० पासून बांधकाम सुरू होणार आहे तर त्यानंतर कटक, नांदेड, झाशी, कटरा आणि उज्जैन येथील मल्टीफंक्शनल कॉप्लेक्सेसचे बांधकाम सुरू होईल.

---> वृत्त पी.टी.आय. च्या हवाल्याने.

Friday, January 8, 2010

वाहतूक सुरक्षा सप्ताह

नमस्कार मित्रांनो,
कालच वाहतूक सुरक्षा सप्ताह संपला.

सामान्य नांदेडीअन्सना या वाहतूक सुरक्षा सप्ताहातून काय मिळाले हे एक कोडेच आहे.
एव्हढे मात्र नक्की की या वाहतूक सुरक्षा सप्ताहामधे नागरिकांना वृत्तपत्रांच्या माध्यमातून नांदेडच्या वाहतूक व्यवस्थेबद्दल बरेच सामान्य ज्ञान मिळाले आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्थेने आणि वाहतूक व्यवस्था सांभाळणार्‍या वाहतूक शाखेने आपल्या कर्तृत्त्वावर स्थानिक वृत्तपत्रांमधे अनेकवेळा रकाने काबीज केलेले आहेत पण या सप्ताहातल्या त्यापैकीच काही मोजक्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात मी तुम्हाला सांगणार आहे.


) दंड वसुलीत वाहतूक पोलिसांची बनवेगिरी !
ट्रेलरला ऑटो दाखविले, पावतीवर वाहनाचा प्रकार बदलला.

गेल्या वर्षात जानेवारी ते ऑगस्ट महिन्या दरम्यान वाहतुकीच्या नियमांचा भंग करणार्‍या वाहनधारकांवर वाहतूक शाखेने दंडात्मक कार्रवाई केली होती.
यात मोठ्या प्रमाणात बनवेगिरी झाली आहे. आर. टी. ओ. कार्यालयातील वाहन प्रकाराच्या नोंदीवरून या हेराफेरीचे बिंग फुटले आहे.
मे ०९ मध्ये चिखलवाडी भागात एम. एच. २६ - ७१८७ या क्रमांकाचे वाहन वाहतूक पोलिसांनी पकडले होते.
मोटार सायकल असा या वाहनाचा प्रकार दाखवण्यात आला होता पण प्रत्यक्षात आर.टी.ओ. कार्यालयात त्या वाहनाची नोंद ट्रक अशी आहे.
कमी दंड आकारण्यासाठी या वाहनाचा प्रकार बदलून दंडाची पावती फाडण्यात आली, हे यावरून स्पष्ट होते
हाच प्रकार जीप, कार, ट्रेलर यांच्याही बाबतीत झाला आहे.

या प्रकारामुळे शासनाचे महसूल बुडत असले तरी पोलिसांचे खीसे मात्र गच्च भरले जात आहेत.
यावरून हेच दिसून येते की वाहतूक शाखा किती प्रामाणिकपणे काम करत आहे.

-- दैनिक प्रजावाणी (४ जाने. २०१०)


) शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कृती कार्यक्रम

शहरातील वाहतुकीला शिस्त लावून नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी ७ जाने. ते ७ फेब्रु. २०१० दरम्यान धडक कृती कार्यक्रम हाती घेण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले.

विविध उपाय योजनेविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले,
रीक्षाच्या उजव्या बाजूने प्रवाशांनी उतरू नये, (७-८ प्रवासी बसल्यावर कोणती जागा उजवी आणि कोणती जागा डावी. मुंबईतली लोकल होते ऑटोरीक्षा अशा वेळी.)
शाळेसाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांची आर.टी.ओ. ने तपासणी करावी,
मनपाने पार्किंगसाठी जागा बनवाव्यात, (आहेत का कुठे रीकाम्या जागा शहरात ?)
अनावश्यक यू-टर्न बंद करावेत, (हे करणे मात्र सहजशक्य आहे.)
रीक्षाचालकांनी रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करू नयेत. (माफ करा सर, पण आपण फारच जास्त आशावादी आहात.)

-- दैनिक प्रजावाणी (५ जाने. २०१०)


) दर्पणदिनी पत्रकाराला वाहतूक पोलिसाचीधक्काबुक्की
पोलिस अधिक्षकांची दिलगिरी.

दर्पण दिनानिमित्त पत्रकारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना वाहतूक पोलिसाने गुरुद्वारा भागात एका वार्ताहराशी धक्काबुक्की केली.
हे वार्ताहार गाडी थांबवून गाडीवर बसलेल्या स्थितीत भ्रमनध्वनीवर बोलत असताना एक ट्रॅफिकवाले मामा तीथे आले आणि त्यांनी तुम्ही आमच्या विरोधात छापत आहात असे म्हणून झोंबाझोंबी करत धक्काबुक्की केली. (बाप रे ! माझ्यासाठी धोक्याची घंटा तर नाही ना ही ?)

-- दैनिक प्रजावाणी (७ जाने. २०१०)


) मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींनाही बेशिस्त वाहतुकीचा फटका !

दि. ७
वेळ दुपारी १ वाजून ४० मिनिटं
शिवाजीनगरकडून मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींच्या गाड्यांचा ताफा आय.टी.आय.कडे जाण्यास निघाला होता.
या मार्गावर नेहमीप्रमाणेच ऑटोंची वर्दळ होती.
शहर वाहतूक शाखेची गाडी सायरन वाजवत रस्ता क्लिअर करत होती पण एक ऑटोचालक मात्र प्रवाशांच्या शोधात रस्त्याच्या मधोमधच उभा राहिला.
दोन मिनिटे वाहतूक स्तब्ध.
शेवटी पोलिसाने मोठ्याने आवाज दिला आणि तो ऑटोवाला बाजूला सरकला.
शहरवासीय मात्र मोठ्या कुतुहलाने चर्चा करत होते की जीथे मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींची ही अवस्था तीथे सामान्य नांदेडीअन्सचे काय ?

आजच वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा समारोप झाला.
निदान या सप्ताहात तरी शहरातील वाहतूक सुरक्षित राहील अशी नांदेडीअन्सची अपेक्षा होती, पण तीसुद्धा फोल ठरली.

-- दैनिक प्रजावाणी (८ जाने. २०१०)


) रस्ते व्यापले पार्किंगने; चालायलाही जागा नाही!

नांदेड - शहरातील वाहतुकीचा जटील प्रश्‍न "सकाळ'ने मागील शुक्रवारच्या अंकात "जागर'च्या माध्यमातून समोर आणला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी पुढाकार घेत संबंधित विभागांची एक बैठकही घेतली. त्यात समस्या सोडवून वाहतुकीला शिस्त लावण्याचा संकल्पही करण्यात आला; परंतु मूळ दुखणे पार्किंगचे आहे. पोटापाण्याची गॅरंटी असणाऱ्यांनी आपल्या अतिरिक्त लालसेपोटी मंजूर नकाशे धाब्यावर बसवून आपल्या जागा वाढविल्या आहेत, त्याबाबत मात्र महापालिका धोरणात्मक निर्णय घ्यायला तयार नाही. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत पार्किंगचा पर्यायाने वाहतुकीचा गुंता सुटणे कठीण आहे.

नांदेड हे शहरच मुळात नियोजनबद्ध पद्धतीने वसलेले नाही. जसे मनात आले तसे वेडवाकडे विस्तारले गेले. हा विस्तार होताना अगोदर नगरपालिका आणि नंतर महानगरपालिकेने मौनव्रत धारण केले होते. किंबहुना येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सोईस्कर दुर्लक्षानेच मंजूर नकाशाच्या विरुद्ध बांधकामे झाली. नगररचनेचा बोजवारा उडाला. अपवाद वगळता इमारत बांधकामाचे नियम कोणीही पाळले नाहीत. निवासी इमारतींची जी परिस्थिती तीच व्यावसायिक इमारतींचीही होऊन बसली आहे. शहरातील कित्येक घरांत आजही स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणे, मोकळी हवा खेळणे दुर्लभ आहे. दिवसाही लाईट लावून दिनचर्या भागवावी लागते. व्यावसायिक इमारतींच्या बाबतीत तर सर्वच नियम धाब्यावर बसविल्यासारखी परिस्थिती आहे. इंचन्‌इंच जागेचा व्यावसायिक वापर केला जातो.

हातावर पोट असणारे रस्त्यावर व्यवसाय थाटतात, त्यात त्यांची अगतिकता तरी आहे. हुसकावून लावले की, ते बिचारे निघूनही जातात; परंतु ज्यांच्या पोटापाण्याची पक्की गॅरंटी आहे, अशांनीही रस्ते व्यापावेत. त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांनी, त्यांच्या दुकानातील सामानांनी रस्त्यावर बस्तान मांडावे, याला त्यांची पैसे मिळविण्याची अतिरिक्त लालसा कारणीभूत आहे, याशिवाय दुसरे काय म्हणता येईल? ही बांधकामे पक्की आहेत, ती तोडणे, पाडणे हे आता अतिशय कठीण काम होऊन बसले आहे. त्याचा महापालिकेने अनुभवही घेतला आहे. अनेक प्रकरणे कोर्टात असतील, त्यावर "जैसे थे' आदेशही असतील. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्यांना आपल्यावर अन्याय होतो असे वाटणे स्वाभाविकच आहे. महापालिका आता पार्किंगसाठी वाढीव एफएसआय देण्याची तयारी दाखवत आहे; पण बंद खोलीत तसे आवाहन करून उपयोग तरी काय, शिवाय त्याला कोणी प्रतिसाद दिलाच नाही तर महापालिकेकडे काय उपाय आहेत, हा प्रश्‍नही अनुत्तरित आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून नव्या पद्धतीचे रस्ते बांधले, त्याचा योग्य वापर होत नाही. जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेत नांदेडचा समावेश डिसेंबर 2005 मध्ये करण्यात आला. महापालिकेने तज्ज्ञ सल्लागारांच्या सहकार्याने शहर विकास आराखडा तयार केला. त्याला जून 2006 मध्ये राज्य शासनाने व जुलै 2006 मध्ये केंद्र शासनाने मान्यता दिली. 2006 व 2007 मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर पूर्व वळण रस्ता, शिवाजीनगर व हिंगोली गेट उड्डाणपूल, सर्व प्रमुख रस्ते आदींच्या कामाला सुरवात झाली. पैकी आजघडीला दोन्ही पुलांसह जवळपास 19 रस्ते पूर्ण झाले आहेत. त्यापैकी महापालिकेने किती कामे हस्तांतरित करून घेतली हा भाग जरी वेगळा असला तरी झालेल्या रस्त्यांचा योग्य वापर होत नाही. तो का होत नाही, तो तसा झाला नाही, तर खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांचा फायदा काय झाला, हे प्रश्‍न पुढे येतात.

विविध प्रशासकीय यंत्रणांचे अधिकारी आपला कार्यकाल संपला की निघूनही जातील, त्यांच्या दृष्टीने येथे निर्माण झालेल्या किंवा भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्या या "परदुःख शीतल' या स्वरूपाच्या आहेत. परंतु स्थानिक रहिवासी म्हणून नांदेडकरांनी याचा गांभीर्याने विचार करून आपल्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज आहे. त्यासाठी ज्यांच्या संवेदना जागृत आहेत, त्या सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. डॉक्‍टर्स, व्यापारी यांनी आपल्याकडे येणारे रुग्ण, ग्राहक यांची वाहने उभी करण्यासाठी आपल्या मालकीची पुरेशी जागा सोडणे अभिप्रेत आहे; पण नांदेडमध्ये तसे झालेले नाही. आता या परिस्थितीत त्या-त्या परिसरातील व्यावसायिकांनी एकत्र येऊन जिथे कुठे मोकळी जागा असेल ती पार्किंगसाठी मिळवावी व त्याचे व्यवस्थापन सांभाळावे. यामुळे किमान अंशी का होईना पण, समस्या सुटायला हातभार लागेल, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम शिकविण्याची गरज
विविध शाळा, महाविद्यालयांत शिकणारे विद्यार्थी सायकल, मोटारसायकल वापरतात. ते जेव्हा घरून शाळेला, कॉलेजला किंवा शिकवणी वर्गाला जाण्यासाठी आपापले वाहन घेऊन रस्त्यावर येतात तेव्हा त्यांना ते कसे चालवायचे एवढेच माहिती असते. वाहतुकीच्या नियमांच्या बाबतीत त्यांना कोणी सांगत नाही. यासाठी आता शैक्षणिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.

राष्ट्रीय वाहतूक धोरणानुसार नेदरलॅंडच्या धर्तीवर आपण रस्ते बांधणी केली; परंतु त्या देशात ज्याप्रमाणे शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे धडे दिले जातात, तसे आपल्याकडे दिले जात नाहीत. खेळाच्या तासाप्रमाणे रस्त्यावर कसे वागावे, वाहन कसे चालवावे, यासाठीही एखादा तास राखीव ठेवायला हवा. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून शाळेतील शिक्षकांना अगोदर प्रशिक्षण द्यावे, आणि शिक्षकांनी मैदानावर चुन्याने फुटपाथ, सायकल ट्रॅक, कॅरेज वे अशापद्धतीची आखणी करून प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम शिकविण्याची गरज आहे.

बहुतांश शाळांना मैदानेच नाहीत; परंतु मैदाने असणाऱ्या किमान मोठ्या संस्थांनी ज्यांच्या संस्थेतील विद्यार्थी संख्या काही शेकड्यांच्या घरात आहे, अशांनी यात पुढाकार का घेऊ नये? असाही प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत. वाहतूक प्रश्‍नावरील बैठकीला आमदार डी. पी. सावंत उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील सर्वांत मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे श्री. सावंत हे सचिव आहेत. त्यांनी तरी पुढाकार घेऊन आपल्याच संस्थेपासून हा उपक्रम सुरू केल्यास अन्य संस्था अनुकरण करू लागतील, अशीही अपेक्षा काही नागरिकांनी व्यक्त केली.


दुभाजक नऊ ठिकाणी खंडित
एकेरी वाहतुकीच्या एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर जाण्यासाठी रस्ते दुभाजक खंडित केले जातात; परंतु कमी अंतरात दुभाजक अधिक ठिकाणी खंडित असतील तर अपघाताचा धोका तर वाढतो, शिवाय वाहतुकीचाही बोजवारा उडतो. कोण कुठून येतोय आणि कुठे जातोय हे समजतच नाही. अशा परिस्थितीत दुचाकींचे अपघात होतात, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.

शिवाजीनगर ते आयटीआय हे अंतर वाहतूक सुरळीत असेल तर अवघ्या दोन मिनिटांचे. पायी जायचे झाल्यास फार तर दहा मिनिटांचे. परंतु एवढ्याच अंतरात या रस्त्यावरील दुभाजक तब्बल नऊ ठिकाणी खंडित करण्यात आला आहे. यामुळे नवीन पद्धतीचा रस्ता असूनही येथे दिवसातून कैकवेळा वाहतुकीचा खोळंबा होतो. छोटेमोठे अपघात तर नित्याचेच झालेत. शहरातील रस्त्यांवर वाहनांचा कमाल वेग ताशी तीस किलोमीटर असणे अभिप्रेत आहे. परंतु खंडित दुभाजक, संथगतीच्या वाहनांचे मोठे प्रमाण, रस्त्यावरील अतिक्रमणे,
हातगाडे यामुळे ताशी दहा किलोमीटरचा वेगही येथे पाळणे कठीण होऊन बसले आहे.

एक हातगाडा किंवा बैलगाडी रस्त्यावरून जात असेल तर त्याला ओव्हरटेक करून जाताच येत नाही. परिणामी मागची संपूर्ण वाहतूक बैलांच्या पावलाने पुढेपुढे सरकते, यात वेळेचा तर अपव्यय होतोच, शिवाय इंधनाचीही नासाडी होते. या परिस्थितीत कित्येक वेळा ऍम्बुलन्स सायरन वाजवत राहते; परंतु त्याला रुग्णालयात तातडीने पोचण्यासाठी रस्ताच सापडत नाही. आपत्कालीन परिस्थिती असेल तर फायरब्रिगेडच्या वाहनालाही खोळंबून राहण्याशिवाय गत्यंतर उरत नाही.

सकाळ वृत्तसेवा
Friday, January 08, 2010 AT 12:00 AM (IST)

Wednesday, January 6, 2010

ट्रेजर बझार



 ज्याची सगळे नांदेडीअन्स आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आता जवळ येऊन ठेपलाय.

होय मित्रांनो, ८ जानेवारीपासून ट्रेजर बझार नांदेडीअन्सच्या सेवेत रूजू होत आहे.

संचालक निलेश ठक्कर यांच्या मते नांदेडचा ट्रेजर बझार हा मराठवाड्यातील सगळ्यात मोठा शॉपींग कॉम्प्लेक्स ठरणार आहे.


 या ट्रेजर बझारमधे मल्टिप्लेक्स, थ्री स्टार हॉटेल, आणि बिग बाजारसुद्धा आहे.


यातले मल्टिप्लेक्स हे ४ स्क्रीनचे असेल (ज्योती बिग सिनेमाचे २ स्क्रीनचे आहे.) आणि हे मल्टिप्लेक्स बहुधा सिनेमॅक्सचे असेल असा अंदाज आहे.

आदिदास, व्हिडीओकॉन, रीबॉक, पिटर इंग्लंड इत्यादी नामंकित कंपन्यांचे शोरूम ट्रेजर बझारमधे असणार आहेत.


ट्रेजर बझारचे औपचारिक उद्घाटन २३ जानेवारी २०१० रोजी माननीय मुख्यमंत्री श्री. अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

EWDPL च्या ब्रॅंड ऍंबेसेडर मलायका अरोरा खान यांचीसुद्धा या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती असणार आहे अशी माहिती EWDPL कंपनीचे सी.ई.ओ. राजेश नायर, कुश मेढोरा व संचालक निलेश ठक्कर यांनी ४ जानेवारीला घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.


 


ट्रेजर बझारमुळे नांदेडच्या वैभवात भर पडणार एव्हढे मात्र नक्की.






PROJECT HIGHLIGHTS



Land Area : 1.1 Lac sq ft

Total Construction : 3.7 Lac sq ft

GLA : 2.5 Lac sq ft





AREA DETAILS



Retail : 1,86,000 sq ft

Hotel : 57,000 sq ft

Commercial : 5,700 sq ft

Parking : 1,13,000 sq ft



Total : 3,61,700 sq ft



 



Exterior

 

 




INTERIOR


  



Sunday, January 3, 2010

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !






नांदेडीअन्सच्या तमाम वाचकांना नववर्षाच्या अंतःकरणपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या उन्नतीचा, तुमच्या प्रगतीचा
दैदिप्यमान प्रकाश सर्वत्र पडो.